अखेर शरद पवारांनी ”भाकरी फिरविली” आणि राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली

मुंबई, दि. 2 (महाराष्ट्र मंथन) :- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘‘भाकरी फिरविली नाही तर करपते’’ अशा शब्दांतून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपद बदलाचे संकेत दिले होते. आज शरद पवार शरद पवारांनी त्यांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्याच संकेताची अधिकृत घोषणा करीत ‘‘भाकरी फिरविली’’ आणि आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेमुळे संपूर्ण राजकीय आणि सामाजिक परिसरात दुःखाचे वातावरण आहे. प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.
राज्यसभेची टर्म 3 वर्षे उरलीय. या तीन वर्षात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नात अधिक लक्ष घालण्यावर माझा भर राहणार. याशिवाय मी दुसरी कुठलीही अन्य जबाबदारी घेणार नाही. कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. मी तशी भूमिका घेणार नाही. पक्षाच्या वरिष्ठांनी नव्या अध्यक्षांसंबंधी निर्णय घ्यावा असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शरद पवारांनी निवृत्तीचा आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?
“महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने 56 वर्षं मला सत्तेच्या राजकारणात ठेवलं. अजूनही माझी राज्यसभेची तीन वर्षं बाकी आहेत. इतकी संधी आजपर्यंत कोणालाही मिळालेली नाही. इतकी वर्षं सतत लोकसभा, राज्यसभेत असणारी व्यक्ती मला पाहायला मिळालेली नाही. करुणानिधी हे एकमेव आहेत, ज्यांचा इतका मोठा कालखंड होता. अडवाणी, वाजपेयी यांना पराभव पाहावा लागला होता. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी पराभल दाखवला नाही. 63 वर्षांपासून माझा प्रवास सुरु असून यातील 56 वर्ष सत्तेत आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
“मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. यापुढे देशाच्या, राज्याच्या प्रश्नात लक्ष घालणार. याशिवाय इतर कोणतीही जबाबदारी घेणार नाही. इतकी वर्षं संधी झाल्यानंतर कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे,” अशी घोषणा शरद पवारांनी यावेळी केली.
पुढे त्यांनी सांगितलं की “मी निवृत्ती जाहीर करत असलो तरी शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा आणि सांस्कृतिक यामध्ये अधिक काम करण्याचा मानस आहे. तसंच युवक, युवती, विद्यार्थी यांना अधिक प्रोत्साहित करत समाजातील कमकुवत घटकाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. मी अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये काम करतो. या सर्व संस्थांमध्ये मी पदाधिकारी आहे. हे काम मी असंच सुरु ठेवणार आहे. वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अधिक वेळ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राने मला खंबीरपणे साथ दिल्याचं मी विसरु शकणार नाही”.

Leave a Comment

READ MORE