रामटेकडी, हडपसर, दि. १६ (महाराष्ट्र मंथन):- साहित्य सम्राट या संस्थेने सालाबादप्रमाणे वारीमध्ये १६८ वे कविसंमेलन राज्य राखीव पोलीस गट क्र.२ (एस.आर.पी.ग्रुप नं. २ ) हडपसर मध्ये आयोजित केले होते. शिवमंदिरात ह.भ.प.बडदे महाराज यांच्या दिंडीमध्ये डॉ.जयवंत अवघडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले.अवघाची संसार सुखाचा करीन या संत वचनाला आत्मसात करीत जीवनाचा आंनद घेऊन आपण सगळे पांडुरंगाच्या भेटीसाठी माहेरच्या ओढीने भक्तिरसात चिंब झालो आहोत, असे अवघडे यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या मंचावर ३५ क्र.दिंडीचे प्रमुख बडदे महाराज, ज्ञानाई फाउंडेशनचे सिताराम नरके, जेष्ठ नागरिक संघाचे ठाकूर, दिंडी स्थळ व्यवस्थापक सूर्यकांत लबडे, ह.भ.प.पुरुषोत्तम गायके महाराज, प्रसिद्ध निवेदक जगदीप वनाशिव आणि साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ उपस्थित होते.
संत, वारकरी आणि कवी यांचे विचार एकच असतात. ते साहित्यातून समाजास नित्य प्रबोधन करीत असतात.म्हणूनच हा वारीतील उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. असे आपल्या प्रास्ताविकात विनोद अष्टुळ म्हणाले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी, गावकरी, जेष्ठ नागरिक संघ आणि भाविक. भक्तीरसातील कविता, अभंग, ओव्या, भारुड, गीते आणि अखंड या काव्य प्रकारामध्ये अक्षरशः भक्तिमय होऊन गेले.
या कविसंमेलनात नानाभाऊ माळी, शरयू गायके, संजय भोरे, गौरव नेवसे, आदित्य राठोड, सौ इनामदार, सौ.अर्चना अष्टुळ, बबन धुमाळ, बाळासाहेब गिरी आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे स्वागत पुरुषोत्तम गायके, सूत्रसंचालन जगदीप वनशिव आणि आभारप्रदर्शन नानाभाऊ माळी यांनी केले.












Users Today : 1
Users Yesterday : 2
Users This Month : 1
Users This Year : 780
Total Users : 42548
Views Today : 5
Total views : 59614
Who's Online : 0