शाळा सर्वेक्षणाची अंमलबाजवणी केली असती तर सार्थकचे प्राण वाचले असते – चेतन बेंद्रे

चिंचवड, दि. १६ (महाराष्ट्र मंथन) :- सार्थकच्या मृत्यूला पिंपरी चिंचवड मनपाचे निष्क्रिय प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे, असा आरोप चेतन बेंद्रे यांनी केला असून मनपा आयुक्त श्री शेखर सिंह यांच्या वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे तसेच दोन महिन्यांपूर्वी झालेल्या शाळा सर्वेक्षणाची अंमलबाजवणी केली असती तर सार्थकचे प्राण वाचले असते असेही त्यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती किती दयनीय आहे, याची आज पुन्हा एकदा पुनरावृत्ती बघायला मिळाली. महापालिकेच्या वतीने सर्व मनपा शाळांचे सर्वेक्षण (structural audit) मागील दोन महिन्यापूर्वी केले. त्या सर्वेक्षणाचे काय झाले? फक्त समिती नेमून, सर्वेक्षण करून फक्त कागदी घोडे नाचवायचे आणि नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करायची. जिन्याच्या लोखंडी रेलिंगवरून विद्यार्थी खाली पडतो म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुठलीही सोय नसल्याचे दिसून येत आहे. शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीये, स्वच्छता नाहीये, सुरक्षा रक्षक नाहीयेत, शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचं सोडून इतर कामे दिली जातायेत, संपूर्ण शाळेची दुरवस्था झालेली आहे, असेही ते पुढे म्हणाले.
मनपाच्या वतीने नागरिकांच्या पैशाने अनेक वेळा नगरसेवक, अधिकारी, शिक्षक यांनी दिल्लीमधील शाळांना भेट दिली. तेथील शालेय व्यवस्था बघितली परंतु त्याची अंमलबजावणी शहरामध्ये केली नाही आणि त्याचा परिणाम आज परत बघायला मिळाला. चिंचवड़ येथील घटनेला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार असल्याने करीत आयुक्त शेखर सिंह यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे चेतन बेंद्रे यांनी मत व्यक्त केले.

Leave a Comment

READ MORE