बाबासाहेबांनी जाळलेल्या मनुस्मृतीचा समवेश विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात करणे अत्यंत निंदनीय – मुकुंद किर्दत

पुणे, दि. २५ (महाराष्ट्र मंथन):- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यामध्ये शाळांचे अभ्यासक्रम बदलले जाणार आहेत. पहिली ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके बदलली जाणार आहेत. आराखड्यानुसार यामध्ये राज्य मंडळाच्या शाळांमधील अभ्यासक्रमात मनूस्मृतीमधील श्लोक तसेच भगवद्गीता आदिचा समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या मनुस्मृतीमध्ये ‘वेद ऐकले तरी त्या स्त्री/दलितच्या कानात उकळते तेल घालावे. स्त्री, शुद्रांनी शिक्षण घेणे हा गुन्हा ठरवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठीचा हा अभ्यासक्रम आराखडा अतिशय बुरसटलेल्या विचारांना महत्त्व देणारा आहे का, असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे. या आराखड्याच्या आधारे पाठ्यक्रम अध्यापन साहित्य पाठ्यपुस्तके मूल्यांकन पद्धती विकसित करणे अपेक्षित आहे. त्यामुळे समाजाला मागे नेणारी मनुची विचारसरणी ही धोकादायक आहे.

यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मनुस्मृतीचे उल्लेख करून हा श्लोक आपल्याला ज्येष्ठ नागरिक पालक आणि शिक्षक यांची सेवा आदर केल्यास विद्या यश आणि बळ वाढते असा विश्वास देतो असे म्हटले आहे. प्रत्यक्षामध्ये भारताचे संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती. असे असताना स्त्रियांविषयी आणि वंचित घटकाविषयी अतिशय घृणास्पद नियम बनवणाऱ्या मनुस्मृतीचा उदो उदो करणे हे निषेधार्थ आहे. नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे जी मार्गदर्शक तत्वे सांगण्यात आली आहेत त्यामध्ये कुठल्याही अभ्यासक्रमाच्या आशयामध्ये लिंग, जात, वर्ग आणि दिव्यांगत्व यासारख्या मुद्द्यांसाठी समानतेवर भर दिला पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. याची दखल फडणवीस आणि केसरकर घेतील अशी अपेक्षा आहे, अन्यथा त्या विरोधात आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल, असे किर्दत यांनी संगितले.

Leave a Comment

READ MORE