…तोपर्यंत “छत्रपती संभाजीनगर” नव्हे “औरंगाबादच” – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

औरंगाबाद, दि. 17 (महाराष्ट्र मंथन) :- औरंगाबाद नामांतराच्या मुद्याने पुन्हा एकदा जोर धरला जेव्हा मा. उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल न करण्याचे निर्देश दिले. त्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असे आदेश काढले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाचे काटेकोर पालन करा असे निर्देश पाण्डेय यांनी सर्व कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांना दिले आहेत. तर याबाबत पाण्डेय यांनी आदेश देखील काढले आहेत.
छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरु केली होती. शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर अनेक ठिकाणी बदललेल्या नावाचा उल्लेख सुरु झाला आहे. तर काही शासकीय कार्यालयांनीही कार्यालयांच्या नामफलकात नवीन नावाने बदल केला आहे.
दरम्यान नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असताना महसूल व इतर विभागांशी संबंधित कार्यालये जिल्ह्याचे नाव बदलत असल्याची बाब याचिकाकर्ते व त्यांच्या विधिज्ञांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल न करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

Leave a Comment

READ MORE