निर्भीड पत्रकारिता टिकविण्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे – राज ठाकरे

निगडी, दि. 20 (महाराष्ट्र मंथन):- राज्यात आज निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे. ही आजची गरज आहे व यासाठी मी नेहमी तुमच्या बरोबर असेल, असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येथे केले.
पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की पत्रकारांवर हल्ले होणे हे चुकीचे आणि निषेधार्थ आहे. महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातील माणसाच्या हिताचे लिहिणे व बोलणे ही आजची गरज निर्माण झाली आहे. आजही राज्यात जे उत्तम व सुसंस्कृत पत्रकार आहेत. मात्र काही वाया गेलेले पत्रकारही असून ते प्रमुख हुद्द्यावर आहेत. या अशा पत्रकारांवर देखील परिसंवाद होणे आवश्यक असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
सध्याच्या राजकारण्यांची भाषा घसरली आहे व याला कारण ते तुम्ही दाखवता हे आहे, असे मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केले. पत्रकार ज्यावेळी चुकीचे वृत्तांत करतात त्यावेळी आम्हालाही राग येतो असं सांगत राज ठाकरे म्हणाले की, राजकारण्यांचे डोळे उघडणे, चिमटे काढणे, प्रबोधन करणे हे काम पत्रकारांचे आहे. राजकारण्यांना सुधारण्याचे काम तुमचे आहे. मात्र तसे न करता तुम्ही जर आमच्यावर हल्ले करत असाल तर आम्ही काय करायचे, असा प्रश्न विचारत राज ठाकरे म्हणाले की पंतप्रधान महाराष्ट्रातील पाटबंधारे विभागातील 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतात व तेच लोक पुढच्या सहा दिवसात सत्य देतात. अशा प्रकारचे राजकीय प्रार्थना झाल्यावर जुने संपादक राजकारण्यांना झोडपून काढायचे पण आत्ताचे पत्रकार तसे करत नाहीत. पूर्वी ब्रेकिंग न्यूज शब्द ऐकला की पोटात गोळा येत असेल परंतु आता फडतूस गोष्टींना ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवले जाते, अशी खंत व्यक्त करत राज्यातील निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे त्यासाठी मी नेहमी तुमच्या बरोबर असेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मंदार फणसे म्हणाले की, पत्रकारांनी सत्तेला प्रश्न विचारले पाहिजेत. सध्या राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांच्या झुंडी तयार झाल्या असून त्या पत्रकारितेवर हल्ला करत आहेत. आपली अराजकतेकडे वाटचाल चालली असल्याचे सांगत ते म्हणाले की, देशाचे अर्थकारण सुधारले नसलेने प्रसार माध्यम पारतंत्र्याकडे चालली आहेत.
कमलेश सुतार यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की आज आपण त्याग केला नाही तर पुढच्या दोन पिढ्यांचे गुन्हेगार ठरवू. त्यामुळे आता पत्रकारितेवर हल्ले जरी झाले तरी आपल्याला काही त्याग केलाच पाहिजे.
संजय आवटे यावेळी म्हणाले की सध्या माध्यमांचे मोठ्या प्रमाणात लोकशाहीकरण झाले आहे त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं माध्यम सुरू करू शकता हे यापूर्वी शक्य नव्हते. या नव्या संधीचा लाभ घेत नव्या पत्रकारांनी या क्षेत्रात यावयास हवे.
सम्राट फडणीस यांनी यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकारिता म्हणजे समाजातील तळाचा आवाज आहे. पूर्वीची पत्रकारिता व आजची पत्रकारिता यात फरक आहे. महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात पत्रकारिता व्यवसाय नव्हता. आता याला व्यवसायाचे स्वरूप आले आहे. मात्र, याबाबत आपण बोलायला लाजत आहोत आपण जर पत्रकारितेतील व्यवसायिकता शिकलो नाही तर या क्षेत्रात काम करणाऱ्यांना कमी मोबदला देऊन आपण त्यांची फसवणूक करणार आहोत.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, नाना काटे, राजू मिसाळ, शत्रूंना काटे, मारुती भापकर, सचिन चिखले आदीं उपस्थित होते.

Leave a Comment

READ MORE