पिंपरी, दि. ३० (महाराष्ट्र मंथन):- पुणे जिल्ह्यातील तळेगाव वराळे येथे घडलेल्या अमानवी आणि दुर्दैवी घटनेत एका २५ वर्षीय महिलेची हत्या करून तिच्या दोन लहान लेकरांना जिवंत नदीत फेकून हत्या केली. सदरील गुन्ह्याचा तपास तळेगाव एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन करत असून, या गुन्ह्यात पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. परंतु, घटना ०८.०७.२०२४ रोजी घडूनदेखील जवळपास २१ दिवस झाले तरी एकही पार्थिव (बॉडी) सापडलेले नाही. याचा अर्थ मुख्य आरोपी पोलिसांची दिशाभूल करत असण्याची शक्यता आहे. म्हणून मुख्य आरोपी गजेंद्रची नार्को टेस्टची मागणी करण्यात आली आहे. तसेच सदरील मुख्य आरोपी पोलिस कस्टडीमध्ये असताना त्याला तळेगाव एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनमध्ये जेवण (बिर्याणी) देऊन राजेशाही सुविधा दिल्याबद्दल तेथील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
https://youtube.com/@maharashtramanthan
सदरील मुख्य आरोपी पोलिस कस्टडीमध्ये असताना त्याला तळेगाव एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनमध्ये जेवण (बिर्याणी) देऊन राजेशाही सुविधा दिल्या जात असल्याचे पीडितांच्या घरच्यांच्या निदर्शनास आले आहे. सदरील बाब अत्यंत गंभीर असून, याची तपासणी करून पोलिस स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, आरोपींना अशा प्रकारे वागणूक दिल्याबद्दल संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र लीगल अध्यक्ष ॲड. तौसीफ शेख, सचिव ॲड. क्रांती सहाने, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख, ॲड. सूरज जाधव, ॲड. रविंद्र आरू, आय. टी. शेख, अब्दुल अजीज शेख, ॲड. मुन्ना शेख, सादिक शेख यांनी पीडित कुटुंबासोबत पिंपरी चिंचवडचे सह पोलीस आयुक्त मा. शशिकांत महावारकर यांना भेटून लिहिलेल्या निवेदनात केली. तसेच पोलीस उप आयुक्त बाबू बांगर यांनाही भेटून निवेदन देण्यात आले. सह पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले.
तसेच, मयत मुलीचे नातेवाईक व वडील यांनी सुरुवातीला स्थानिक पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली होती. परंतु स्थानिक पोलिसांनी तत्काळ आणि योग्य पावले उचलली असती, तर त्या दोन लहान मुलांचे प्राण वाचवले जाऊ शकले असते. पोलिसांनी त्यावेळी आवश्यक तातडीची कारवाई केली नाही, ज्यामुळे पीडितांना अत्यंत दुःखद परिस्थितीचा सामना करावा लागला. स्थानिक पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणाची चौकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याबाबत कारवाई करण्याची लेखी मागणी करण्यात आली आहे.










